Who doesn’t want such an vicinity where there is absolutely no disturbance and where there is thorough peace. We all love such an experience. However, you can get such an ambience only when you trek, hike, camp in the real nature, up the mountains.
camping near pune
निसर्गसौंदर्य हा हल्ली एक परवलीच शब्द झालेला आहे. प्रत्येकाला निसर्गसौंदर्य आवडते. सुंदर असलेल्या निसर्गात जायला आवडते, त्यात रमायला आवडते, त्याचे फोटो काढायला आवडते. हे निसर्ग सौंदर्य म्हणजे नक्की आहे तरी काय? निसर्ग मुळातच सुंदर आहे. त्याला मानवी क्रुत्रिम उपायांची गरज नसते. उलट एखाद भुभाग सुंदर करण्यासाठी मानव जर काही करीत असेल तर ते म्हणजे त्या सुंदर निसर्गाचे विद्रुपीकरणच होय. निसर्ग सुंदर वाटतो, भासतो, अनुभवता येतो, दिसतो याचे कारण नुसते दृश्य स्वरुप असते असे नव्हे. तर त्या निसर्गामध्ये तेथील सर्व सजीव-निर्जीवांमध्ये एक सामंजस्य असते. हे सामंजस्य म्हणजे हारमनीच निसर्गाला सुंदर करीत असते. म्हणजेच काय तर मानवी ह्स्तक्षेप जिकडे नाही तिकडे निसर्ग सुंदर आहे. निसर्ग शाळेच्या पाहुण्यामध्ये अनेकजण मला विचारतात की तुम्ही रस्त्याने जागोजागी निसर्गशाळेचे बोर्ड का लावित नाही. असे केल्याने तुमचे ठिकाण ग्राहकांना सापडणे सोपे होईल व तुमची जाहिरात देखील होईल. मी नेहमीच सर्वांना छान कल्पना आहे असे म्हणुन त्यांचे समाधान करतो. अगदीच कुणी इच्छुक असेल ऐकायला तरच मी माझ्या निसर्गसौंदर्याच्या कल्पनेला या बोर्ड व होर्डींग मुळे कसा बाध येतो हे सांगतो. एक काळ होता, कोथरुड ओलांडुन, पिरंगुट कडे गाडी निघाली की, अप्रतिम निसर्गसौंदर्याचा अनुभव प्रवाश्यांना यायचा. सुंदर हिरवाई, डोंगर, नाले हे सगळे अगदी रस्त्यवरुन दिसायचे. आता चित्र बदलले आहे. एनडीये चौक ते मुळशी दहा हजारांच्या वर विविध फलक रस्त्याने लावले आहेत. यातील मोजके कायदेशीर परवानग्या घेऊन लावले आहेत, बाकी सारेच्या सारे बेकायदेशीर तर आहेतच पण त्याही पेक्षा जास्त ते परिसराला कुरुप करणारे आहेत. यात दुकांनाचे फलक, बांधकाम व्यावसायिकांचे फलक, नेत्यांच्या वाढदिवसांचे फलक, हॉटेलांचे फलक, हॉस्पिटल वाल्यांचे फलक, दवाखान्यांचे फलक, चिकन दुकानदारांचे फलक, स्वीट दुकानदारांचे फलक, टेलरचे फलक, ब्युटी पार्लरचे फलक, फलक फलक नुसते फलक. जिकडे पहाव तिकडे फलक. दुकानाचा , दुकानाच्या वर असलेला फलक एक वेळ आपण समजु शकतो, पण दिकानासमोरच, रस्त्यावरुन ये जा करणा-या वाहन चालकांना आणि प्रवाश्यांना सहज दिसावे म्हणुन, रस्त्याला काटकोनात, लोखंडी फ्रेम मध्ये उभे केलेले, वीजेच्या खांबावर बांधलेले, झाडांना लटवलेले, भिंतींवर लावलेले, असे सगळे फलक अजाणतेपणी, प्रत्येक प्रवाश्याला अशांत करतात. प्रवाश्यांना हे समजत देखील नाही की त्यांना जबरदस्तीने, अनावश्यक जाहीरातबाजीला बळी पडावे लागत आहे. आपण पाहिलेले प्रत्येक दृश्य आपल्या अंतर्मनामध्ये नोंदले जाते. ही नोंद अनावश्यक असते. हे सारे आहे दृष्टी प्रदुषण. एखाद्या सुंदर निसर्गदॄश्यामध्ये, ज्यामध्ये कसलीही इमारत नाही, कसला ही कचरा नाही, प्लास्टीक नाही; जे काही आहे ते केवळ सगळे नैसर्गिक आहे. तर अशा सुंदर प्रदेशात मध्ये जर मी निसर्गशाळेचा बोर्ड लावला तर काय होईल? तर याने त्या नैसर्गिक सौंदर्याला बाध येईल. गाडीतुन प्रवास करीत असताना, आमच्या ग्राहकांना निसर्गसौंदर्याचा जो अनुभव घेता येतो, जे सौंदर्य पाहता येते ते सर्वांनाच आवडते. आणि आमच्या ग्राहकांशिवाय देखील हजारो लोक या रस्त्यांनी प्रवास करीत असतात. या सर्वांना निर्भेळ निसर्ग पाहता यावा, अनुभवता यावा ही आमची प्रांजळ भावना या मागे आहे. अर्थात माझ्या एकट्याने असा विचार केल्याने फार काही फरक पडेल असे अजिबात नाही. अन्य व्यावसायिक अगदी शे-दोशने मीटर अंतरावर त्यांच्या व्यवसायाच्या, रिसॉर्ट्स च्या जाहीरातीचे आणि दिशादर्शनाचे फलक लावतात. आणि हे सारे फलक निसर्गसौंदर्याला बाध आणतात. निसर्ग पाहायला येणा-या सर्वच पर्यटकांचा हा जन्म सिध्द अधिकार आहे. किमान आमच्या कडुन तरी या अधिकाराला बाध येणार नाही याची आम्ही दक्षता घेत असतो.   आणि राहिला प्रश्न दिशादर्शकांचा, तर त्यासाठी गुगल मॅपचा पर्याय आम्ही आमच्या सर्व ग्राहकांना व्यवस्थित समजावुन देतो. त्यामुळे आमचे ग्राहक, आमच्या कॅम्पसाईट पर्यंत न चुकता येतात. एखाद दुसरा चुकतो देखील. चुकण्याचे कारण सुचनांचे नीट पालन न करणे हे असते. गुगल मॅप जिथपर्यंत घेऊन येतो , तिथे आमचा एक बोर्ड, दिशादर्शनाच्या बाणासहित असतो. पण हा फलक कायमस्वरुपी नाही. हा फलक ग्राहक पोहोचण्याच्या काही तास आधी तिथे लावला जातो व अपेक्षित ग्राहक पोहोचले की तिथुन काढला जातो. हा आमचा एक तोकडा प्रयत्न आहे, निसर्गसौंदर्य अबाधित राखण्याचा. अधिकाधिक लोकांनी /व्यावसायिकांनी से केले तर दृष्टी-प्रदुषण कमी होईल.   हेमंत ववले ९०४९००२०५३ निसर्गशाळा, पुणे
आपल्या सह्याद्रीची ओळख म्हणजे त्याचे बेलाग सुळके, अतिखोल द-या ,श्वास रोखायला लावणारे कातळ कडे. सह्याद्रीची ओळख म्हणजे सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर उभारलेले, गगनचुंबी अभेद्य गडकोट. सह्याद्रीची ओळख म्हणजे इथली हजारो वर्षांची महान संस्कृती. सह्याद्री ची ओळख म्हणजे याच संस्कृतीतुन जन्माला आलेले एक लोकोत्तर नर-रत्न – छत्रपती शिवाजी. सह्याद्री ची ओळख म्हणजे शिवाजी राज्यांच्या सोबत, कधी कधी त्यांच्याही पुढे जाऊन, प्राणांची बाजी लावणारे सह्याद्रीचे लाखो करोडो सुपुत्र म्हणजे मावळे. सह्याद्रीची ओळख म्हणजे त्याच्या अंगाखांद्यावर उगम पावुन, पुर्व दिशेचा लाखो-करोडो हेक्टरचा प्रदेश सुपीक करणा-या नद्या. सह्याद्रीची ओळख म्हणजे कातळ कड्यांवरुन बेधुंद होऊन, खोलवर द-यांमध्ये उड्या घेणारे, स्वतःला झोकुन देणारे हजारो धबधबे. सह्याद्रीची ओळख म्हणजे इथला मोसमी, बहारदार पाऊस. सह्याद्रीची ओळख म्हणजे… सह्याद्रीची ओळख नव्याने माझ्या सारख्या भटक्याला अगदी रोज होत असते. जेव्हा जेव्हा मी निसर्गात, सह्याद्रीच्या राकट प्रांगणात जातो तेव्हा तेव्हा, मला सह्याद्री नव्याने ओळख होत असते. सह्याद्री नित्य-नुतन जरी मला वाटत असला तरीही, मित्रानो माहितीये का तुम्हाला की सह्याद्री जगातील सर्वात वयोवृध्द डोंगररांगांमधील एक आहे. सुमारे १५ करोड वर्षांचा आहे बरका आपला लाडका सह्याद्री. म्हणजे १५ करोड वर्षांपुर्वी सह्याद्री (दख्खन पठारासहीत) आशिया खंडाशी जोडला गेला. त्यापुर्वी म्हणजे अंदाजे ४० करोड वर्षांपुर्वी पृथ्वीवर एकच भुखंड होता. मागील शतकातील एक भु-शास्त्रज्ञ आल्फ्रेड वेगेनेर यांनी त्यांचे सगळे आयुष्य खंडांतराच्या (खंडांतर हा मी योजलेला शब्द आहे याला इंग्रजी मध्ये Continent Drifting असे म्हणतात) अभ्यासासाठी वेचले. वेगेनेर यांनी पृथ्वीवरील सर्वात जुन्या, एकमेव असलेल्या भुखंडाला पॅंजेया/पॅंगईया म्हणजे संपुर्ण पृथ्वी असे नाव दिले. साधारण पणे ४५० करोड वर्षापुर्वी, अंतरिक्षामधील धुळ, वायु व इतर अंतरीक्षीय घटकांमुळे पृथ्वीची निर्मिती झाली. त्याच दरम्यान सुपरनोव्हा म्हणजे महाभयंकर विस्फोटामुळे, पृथ्वीचे तापमान वाढुन, धुळीने तयार झालेला तो गोळा वितळला. त्यालाच आपण ज्वालामुखी म्हणतो. हा ज्वालामुखीच जसजसा प्रवाही झाल त पासुन प्रत्यक्ष खडक, पर्वत, डोंगर तयार झाले तेव्हा पृथ्वीवर एकच भुखंड तयार झाला. एकच असलेला हा भुखंड काही काळाने तुटला व अनेक छोटे-मोठे भुखंड वेगवेगळे होऊन पृथ्वीवर विखुरले गेले. खरतर हा खुप मोठा विषय आहे. याविषयी आपण कधीतरी पुन्हा सविस्तर माहिती घेऊ . खालील व्हिडीयो पहा म्हणजे तुम्हाला अंदाज येईल, सह्याद्री व हिमालय कसा अस्तित्वात आला. वर मी सह्याद्रीस वयोवृध्द म्हणालो याचे कारण असे की, हिमालय पर्वत रांग की जगातील सर्वात उंच पर्वतरांग आहे, ती भारतीय उपखंडाची व आशिया खंडाची धडक झाल्यानंतर अस्तित्वात आली आहे. हिमालयाचा जन्म त्या मानाने खुप अलीकडचा आहे. म्हणुनच सह्याद्रीस मी वयोवृध्द डोंगर असे म्हणतो. सह्याद्रीच्या पुरातन असण्याच्या खाणाखुणा आपणास सह्याद्रीच्या कातळाकड्यांकडे पाहुन दिसतात. नुकताच मी, साल्हेर सालोटा या गडांना भेट देऊन आलो. यातील सालोटाचे कातळ कडे तुटण्याच्या मार्गावर आहेत. एखादा हलका भुकंप देखील सालोट्याचा भुगोल बदलुन टाकेल. अशीच काहीशी अवस्था आपणास सह्याद्री उत्तुंग सुळक्यांची झालेली दिसते.   आपल्या मुळशी वेल्हे तालुक्याचा पश्चिम भाग म्हणजेच मावळ भाग हा सह्याद्रीचाच भाग होय. मुळशीतील ताम्हिणी म्हणजे हंगामी पावसासाठी भारतातील सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण आहे. तशीच अवस्था  भोर – वेल्ह्यातील मावळ पट्ट्याची आहे. कित्येक ठिकाणी पर्जन्यमापकाची उपलब्धता नसल्याने वास्तविक पर्जन्यमान कुठे किती होते याची माहिती मिळत नाही. पण मावळ पट्ट्यात तीन-तीन चार महिने सुर्यनारायणाचे दर्शन होत नाही. काहीशे वर्षांपुर्वीपर्यंत इथे वर्षावने होती. ही जंगले इतकी घनदाट होती की उन्हाळ्यामध्ये देखील सुर्यकिरणे जमिनीवर पडत नसत. किर्र्र झाडी, महाकाय वृक्ष, तितक्याच मोठाल्या, जाडजुड, पुरातन वेली हे सारे सह्याद्रीला एका विशिष्ट ऊंचीवर नेऊन ठेवते. सह्याद्रीतील किल्ले हे जितके उत्सुकतेचा विषय आहे तितके जास्त कुतुहलाचा विषय आहे सह्याद्रीतील वनसंपदा. या वनसंपदेमध्ये, दरी-खो-यात, नद्या-नाल्यांत, कातळ-कड्यांवर, धबधब्यांवर, मोकळ्या माळरानांवर एक आख्खी सजीवसृष्टी गेली लाखो वर्षे जगत आहे, हे आपणास ठाऊक आहे काय? नाचणारा बेडुक नावाची एक बेडकाची प्रजाती आहे, ही प्रजाती किमान सात लक्ष वर्षांपासुन सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर नांदते आहे. सरीसृप, उभयचर, जलचर अशा अनेक प्रजाती इथे लक्ष-लक्ष वर्षांपासुन नांदत आहेत. मनुष्यास या सर्वांविषयी जेवढे ज्ञान आहे त्याच्यापेक्षा कित्येक पटींनी जास्त ज्ञान आपण अजुन मिळवायचो आहोत. आपण अनभिज्ञ आहोत. भारताच्या एकुणच हवामानावर परिणाम करणारा मॉन्सुन म्हणजे मोसमी पाऊस भारतात पडतो याचे कारण फक्त आणि फक्त सह्याद्री आहे. एकेकाळी सजीव सृष्टीसाठी नंदनवन असणारा सह्याद्री वर्तमानात सजीवांसाठी शाप ठरत आहे. सजीव म्हणताना मी यांत मनुष्यास देखील मोजले आहे. आज भलेही अज्ञान, दुर्लक्ष इत्यादी कारणामुळे मनुष्यास वाटत असेल की तो सुरक्षित आहे, पण वस्तुस्थिती तशी नाहीये. व याचे संकेत युनेस्को द्वारे काही वर्षांपुर्वी दिले गेले आहेत. जगातील आठ जागतिक वारसा असलेल्या स्थळांच्या यादीमध्ये सह्याद्रीला स्थान देण्यात आले आहे. सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर कित्येक सजीव नांदताहेत मित्रहो. फुले येणा-या वृक्ष-वनस्पतींच्या एकुण ७४०२ प्रजाती सह्याद्रीमध्ये आहेत. फुले न येणा-या वनस्पतींच्या अंदाजे १८०० प्रजाती आहेत.सस्तन प्राण्यांच्या १३९ प्रजाती आहेत. पक्षांच्या ५०८ प्रजाती आहेत. १७९ उभयचर, ६००० किटकांच्या प्रजाती, २९० गोड्यापाण्यातील माश्यांच्या प्रजाती आहेत. इथल्या जंगलांची आणखी एक खासियत अशी आहे की, ही जंगले सदाहरीत आहेत. झाडा-झुडूपांच्या इतक्या प्रजाती आहेत की काही झाडांची पाने जरी काही काळापुरती गळली तरी एकुण जंगल मात्र हिरवेगारच दिसते. तुम्हाला हे पहायचे असेल तर याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात केलेल्या कोकण दिवा या ट्रेकचा व्हिडीयो अवश्य पहा. सह्याद्री आणि मॉन्सुन चे जसे नाते आहे तसेच नाते सह्याद्री व दुर्मिळ होत असलेल्या प्रदेशनिष्ट (Endemic) प्रजातींचे आहे. जागतिक दृष्टीने पाहिले तर नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या प्रजातीपैकी ३२५ प्रजाती सह्याद्रीमधील आहेत. ही अत्यंत दुखःद गोष्ट आहे. या ३२५ प्रजातींमध्ये २२९ प्रजाती वृक्ष-वनस्पतींच्या, ३१ प्रजाती सस्तन प्राण्यांच्या, १५ पक्ष्यांच्या, ४३ उभयचर, ५ सरपटणारे व एक मासा आहे. यापैकी ५१ प्रजाती कदाचित त्यांच्या अखेरच्या काही पिढ्यांमध्ये आहेत. निसर्गाशी मानवी नाते, काहीशे वर्षांपुर्वीपर्यंत तरी सौहार्दाचेच होते असे मी म्हणु शकतो. याचे कारण असे की, मावळ भागातील काही लोकरिती मनुष्य व निसर्ग यातील सौहार्द दाखवणा-या आपणास पहावयास मिळतात. उदा – जेव्हा जुन जुलै मध्ये पावसाला सुरुवात होते, तेव्हा मोठ्या नद्या, धरणांतील मासे अंडी सोडण्याकरीता, नदीच्या उगमस्थानाकडे पोहण्यास सुरुवात करतात. नदीच्या प्रवाहाच्या उलट दिशेने ते पोहतात. हजारो वर्षे मावळात राहणा-या मावळ्यांना, माश्यांच्या या प्रवासाविषयी माहिती अगदी पुर्वापार आहे. असे उलट दिशेने पोहणारे मासे पकडणे व खाणे खुपच सोपे काम आहे. तरीही मावळातील मंडळी, अंडी सोडण्यासाठी प्रवाहाच्या उलट दिशेने जाणारे मासे पकडत नाहीत व खात ही नाहीत. हेच मासे जेव्हा, अंडी सोडतात व पुनः प्रवाहासोबत पोहण्यास सुरुवात करतात तेव्हा, विशिष्ट पध्दतीचे बांबु व लाकडी जाळे तयार करुन मासे पकडले जातात.  विशिष्ट पध्दत अशासाठी म्हणायचे की, जाळ्यातील एकेका अटकावाचा आकार एवढा असतो की यात विशिष्ट वयाचाच, विशिष्ट आकाराचाच मास अडकेल. व लहान मासे, की जे अजुन पुर्ण वाढलेले नाहीत ते पुन्हा नदी-धरणात जातात. म्हणजे नैसर्गिक प्रजनन प्रक्रियेवर फारसा परिणाम न करताही मावळातील सुज्ञ लोक मांसाहार करीत होते. आजही अशा पध्दती आपणास पहावयास मिळतात. हे नाते देखील, वाढत्या शहरीकरणामुळे , दुर्मिळ होत चाललेल्या प्रजातींसारखेच, नष्ट होण्याचा मार्गावर आहे. व हेच खरे कारण आहे, सह्याद्रीच्या होत असलेल्या –हासाचे.